बहुजननामा ऑनलाईन – सांगली आणि कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता अनेक आजारांनी आपले डोके वर केले आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसत आहे. या शहरात आरोग्य विभागाचे अधिकारी दाखल होऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान या दोन्ही जिल्हातील एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात दोन्ही जिल्हातील मिळून ऐकून ९ हजार पूरग्रस्त तापाने फणफणले असून तीन हजार रुग्णांना जुलाबाची लागण झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता अनेक नागरीक आपल्या घरी परतले तर मदत छावण्यांमधील नागरिकांची संख्या ही घटली आहे. घरी गेलेल्या नागरिकांचे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हात आरोग्य विभागाचे ३२६ आणि सांगली जिल्ह्यात १३४ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. या परिसरात पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे तर कीटकनाशक औषधांची धूर फवारणी करण्यात येत आहे.
सांगली जिल्हयात १६ हजार ६२३ नागरिकांना आणि कोल्हापूर जिल्ह्यात ७४ हजार ६८७ नागरिकांना लेप्टोस्पायरोसिसचा आजार होण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांना प्रतिबंधक डॉक्सिसायक्लिन हे औषधे देण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिसार तसेच अन्य आजारांसह तापाचे रुग्णदेखील आढळले आहेत. यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता जरी पूर ओसरला तरी संसर्गजन्य आजार मात्र झपाट्याने वाढू लागला आहे.