मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. काल त्यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा त्यांनी आता यु टर्न घेतल्याचे दिसत आहे.
उदयनराजे भोसले यांनी गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. याशिवाय उदयनराजेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत कोणत्या टप्प्यात भाग घेतला नाही. उदयनराजे यांची शिवस्वराज्येत यात्रेत स्टार प्रचारक म्हणून निवड झाली होती. तरीही त्यांनी कशात सहभाग नोंदवला नाही, तेदेखील यात्रा साताऱ्यात होती तरीही. असे असले तरी त्यांनी आपली भाजप प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली नव्हती. कालपर्यंत राजे भाजपमध्ये जाणार नसल्याचे म्हटले जात होते. पंरतु आज अचानक राजेंनी मुंबईची वाट धरली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेश रोखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न
उदयनराजे भोसले भाजप प्रवेशाच्या तयारीत होते तेव्हा आघाडीतील अनेक नेते त्यांची समजूत काढताना दिसले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेतली होती. त्याआधीही राष्ट्रावादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही उदयनराजेंची भेट घेतली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
‘सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणे योग्य नाही’ : उदयनराजे भोसले
काही दिवसांपूर्वीच आपल्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी म्हणाले होते की, “मागील अनेक दिवसांपासून भाजपचे लोक प्रवेशासाठी माझ्या मागे लागले आहेत. भाजपची वाटचाल सध्या जोरात सुरु आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. भाजपच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत. कंपन्या बंद आहेत. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. गेल्या 4-5 वर्षात साताऱ्यात विकासकामे झाली. सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणे योग्य नाही.”