मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर पाटील यांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही धक्का आहे असे मानले जाते.
हर्षवर्धन पाटील यांनी 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण 6 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्ष आणि त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी पाटील यांची मनधरणी करण्यात आली. बदल्यात राष्ट्रवादीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे त्यांनी सुळेंना मदत केली. सुळेंना मताधिक्यही मिळाले. परंतु ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.