मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर पाटील यांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही धक्का आहे असे मानले जाते.
पाटील यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे नेत्यांची भाजपकडे ओढ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दिवसात घेतेल्या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे. इंदापूरचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या प्रवेशामुळे इंदापूरमधील भाजपची ताकद वाढली असून इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपचे उमेदवार असतील.” अशी त्यांनी घोषणा केली.
‘निष्ठेने वागायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही’
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “निष्ठेने वागायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही. जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊ.” असेही त्यांनी म्हटले. याशिवाय यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं.
‘तर खासदार झाले असते…’
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील आधी भाजपामध्ये आले असते तर एव्हाना ते खासदार झाले असते.”