बहुजननामा ऑनलाईन- ‘दीपक केसरकर हे जादूगार आहेत. करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं.’ असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गृहमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
मात्र दीपक केसरकरांनी हे आरोप फेटाळून लावत साळगावकरांना आमदारकीची स्वप्ने पडत असल्याने ते असे आरोप करत आहेत. त्यांचे हे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगितले. आतापर्यंत मी त्यांना माझा राजकीय वारसदार समजत होतो. मात्र यापुढे ते माझे राजकीय वारसदार नसतील असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही. असेही त्यांनी नमुद केले.
तसेच, भाजप शिवसेना युतीमुळे गेल्या पाच वर्षात एकदाही सिंधूदुर्ग जिल्ह्यात गोंधळ झाला नाही. ही जादू मी केली. जर ही जादू असेल तर ती मी पाच वर्षात करुन दाखविली. केलेल्या कामाच्या फुशारक्या मारु नयेत असा टोलाही त्यांनी साळगावकरांना यावेळी लगावला. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. शिवसेनेला विचारात घेऊनच राणेंना प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तर नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल स्वत:च तारीख जाहीर केली आहे.