बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. पण त्यातल्यात्यात सध्या वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची मात्र जोरदार चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी वंचित आघाडीने नगर शहरातून किरण काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे उमेदवार आहेत. असं असलं तरी काळे यांनी आपल्या ‘युनिक’प्रचार पद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काळे यांनी आपल्या प्रचारार्थ स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. या वचनाम्यात कुठलीही आश्वासन नसून, त्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांची ‘राजकीय कुंडली’ अगदी व्यवस्थित मंडळी आहे. वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एकूण २१ वचनं दिली आहेत.
वचननामा काहीसा असा :
१) मी गुंडगिरी करणार नाही
२) पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही.
३) मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही
४) मी कोणाचाही खून करणार नाही.
५) कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.
६) कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही
७) नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही
८) राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही
९) एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही
१०) प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली असून एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
Visit : bahujannama.com