बहुजननामा ऑनलाईन – माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात कोणत्या परिस्थितीत संजय गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, लखनऊ येथून चेतन चौहान यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पाठवले गेले. एसजीपीजीआय सारख्या नामांकित संस्थेवर सरकारचा विश्वास नाही का? सरकार झोपलेला राहिला आणि राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला. सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे 16 ऑगस्टला निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौहान यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय मधून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यापासून ते कोरोनाची लढा देत होते. चौहान यांना सुमारे 36 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.