मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकताच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. उर्मिला मांतोडकर आणि शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांचा फोन झाल्याने राजकीय चर्चा होताना दिसत आहेत. परंतु फोनवरील चर्चा ही मैत्रीतून असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.
काँग्रेसमध्ये असताना उर्मिला यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. परंतु त्यांनी शिवसेनेवर कधीच टीका केली नाही. त्यांचे ठाकरे कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मातोश्री आणि उर्मिला यांच्यातही मराठी कलाकार म्हणून चांगले संबंध आहेत. हे संबंध आता राजकीय होणार की, काय अशा चर्चा सुरु झाल्याचे दिसत आहे. मातोश्रीनेही उर्मिला यांच्याशी मराठी लेक म्हणूनच कायम मैत्रीचे संबंध ठेवले आहेत.
काही दिवसांपूर्वीच उर्मिला यांनी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर याना फोन केला होता. परंतु याबाबत बोलताना नार्वेकर म्हणतात, ही चर्चा राजकीय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे झाली. या भेटीला कुणीही राजकीय रंग देऊ नये.” अशी विनंतीही त्यांनी केली. असे असले तरी उर्मिला मांतोडकर भगवा हाती घेणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होताना दिसत आहे.