बेलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बेलापूर विधानसभा मतदारसंघात मी परत येणार असून निवडणुकीनंतर विजयी मेळावा घेणार असं वक्तव्य शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभांपैकी बेलापूर विधानसभा शिवसेना लढववणार असल्याचे संकेत यातून त्यांनी दिले आहेत. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सोमवारी नवी मुंबईत दाखल झाली होती. बेलापूर आणि ऐरोली विधानसभेत त्यांचं स्वागत करण्यात आलं.
आदित्य ठाकरे यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे की, नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा भाजपा तर बेलापूर विधानसभा सेना लढणार आहे. त्यामुळे आता याचा फटका नुकत्याच भाजपवासी झालेल्या गणेश नाईकांना बसणार आहे. ते बेलापूरमधून लढतील अशी चिन्हं होती. भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे.
भाजपच्या पहिल्या आणि मोठ्या कार्यक्रमातून गणेश नाईकांचा काढता पाय
नवी मुंबईत भाजपचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आले होते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांचा नवी मुंबई गड असल्याने तेही या कार्यक्रमाला हजर होते. परंतु त्यांना व्यासपीठावर न बोलावल्याने ते नाराज झाले आणि तेथून निघून गेले. त्यांचा वाढदिवस असल्याने ते बाहेर पडले असे सांगण्यात आले. कलम 370 हटवल्यानंतर जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.