मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या धावत्या दौऱ्यावरून भाजपने टीका केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही ट्विट करत शेलक्या शब्दात या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021
मुख्यमंत्र्यांकडून कोकणाची थट्टाच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकणच्या धावत्या दौऱयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी संकट काळात कोकणच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. कित्येक दिवसांनंतर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले, मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोललेच नाही. गेल्यावेळी निसर्ग वादळ झाले. त्यावेळी अनेक घोषणा झाल्या मात्र मदत काही नुकसानग्रस्तांना मिळाली नाही. हेक्टरी पैसे दिल्याने ५००रु प्रतिझाड एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे कोकणवासीयांची एक प्रकारची थट्टाच केली असे त्यांनी म्हंटले.