औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभेत आपली ताकद प्रस्थापित पक्षांना दाखवुन देत जवळपास ४१ लाखांवर मतं मिळवली तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ अधिक सरस कामगिरी करणार असा विश्वास, अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीकडे महिलांचा कल वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष नवखा होता. त्यातच पक्षाला उशिरा मान्यता मिळाल्यामुळे लोकसभेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी शनिवारी औरंगाबादेत इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी त्या उपस्थित होत्या. त्यावेळी बोलताना अंजलीताई म्हणाल्या की, ‘वंचित’च्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येत आहे. परंतु, मुलाखतीसाठी आलेल्या महिलांचा प्रतिसाद भारावून टाकणार आहे. तसेच ‘वंचित’कडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढत असून वकील, एमबीए, निवृत्त शिक्षिका वंचितमध्ये येण्यास इच्छूक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
दरम्यान, वर्षानुवर्षे उपेक्षित ठेवलेल्या महिला वर्गाला राजकारणात स्थान मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा ‘वंचित’चा मुख्य हेतू आहे. त्यामुळे पद देताना महिलांचे शिक्षण पाहिले जाणार नाही. अनेकदा महिलांना सामाजिक स्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. परंतु, त्यांना राजकारणाची जाण असते. अशा महिलांना पक्षात स्थान देणार असल्याचे अंजलीताई यांनी म्हंटले आहे.