नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – समाजातील अनेक विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यातच आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून अजून लांबच आहे असाच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या दोन हजार आदिवासी चिमुकल्यांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २५ शाळांमधील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
प्रादेशिक परिवहन विभागातील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांनी माणूसकी जपत सामाजिक दातृत्व निभावले आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल कदम, संदीप निमसे, सचिन बोधले, अनिल केदार, पल्लवी कोठावदे या तरुण व उच्चशिक्षित आधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ येथील साहित्य वाटप कार्यक्रमास अमृता कदम, मनिषा निमसे, उज्ज्वला बोधले, किर्ती केदार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगाव, मेटघर किल्ला, सापगाव, चिकाडी, ससूणे,वाळीपाडा, पेठ तालुक्यातील गढईपाडा,वाजवड, वडपाडा, केळबारी, कोळूष्टी, देवीचामाळ, पांघुळघर, शेवखंडी, एकदरे, तोंडवळ, घुबडसाका, गांडोळे, भाटविहिरा, आमडोंगरा, हरणगाव तर सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ, सर्कलपाडा, कोटंबी, हनुमंतपाडा, बाफळून आदी दुर्गम व आदिवासी गावातील मुलांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी साहित्य वाटप करण्यात आले.
यामुळे खेड्या पाड्यातील वंचित मुलांमधूनही भविष्यातील नेते-अधिकारी निर्माण होतील याबाबद काहीही शंका नाही. सामाजिक भान जपणारे अनेक हात एकत्र आल्यास किती मोठे काम उभे राहू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली आहे.