मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून शासनाच्या निर्णयानुसार 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 5 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. पुन्हा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 5 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या बदल्या होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदांच्या बदल्या पुन्हा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील मतभेत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर इतर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष लागले होते. मात्र, आज शासनाने पत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास 30 सप्टेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली.