बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरातील मध्यवस्तीत दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्राधान्य देणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली.
पोलीस आयुक्तालयात आयोजित दिवाळीनिमित्त कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे, स्वप्ना गोरे, भाग्यश्री नवटके उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले, दिवाळीनिमित्त बाजार पेठामध्ये गर्दी वाढत चालली आहे. त्या पार्श्र्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, तरीही काही भागांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत असल्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या कालखंडातही खरेदीसाठी बाहेर पडणा-या नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
शहरातील विविध भागात नेहमीपेक्षा दुपटीने वाहनसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार आहेत.