बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन नव्या केंद्रीय कृषी कायद्यांबाबत भाष्य केलं. कृषी कायद्याबाबत आज राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी वार्ताहरांशी संवाद साधला. “एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही,(Ajit Pawar) ही माझी वैयक्तिक भूमिका आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
पवार म्हणाले, “देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही केंद्रास चर्चा करण्यात सांगितलं आहे. आमची भूमिका मान्य करा अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, दिल्लीतील आंदोलन चिघळले आहे. म्हणून कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल केले जातील, मात्र संपूर्ण बिल रद्द करा ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनास महाविकास आघाडीचा पाठींबा आहे. त्याच अनुषंगाने महत्वाची बैठक होत आहे.”
“बैठकीत प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात येईल, काही जणांचे मत आहे की संपूर्ण विधेयक रद्द करा. यासाठी सर्वांशी चर्चा करु, पण एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही, असेही अजित पवार यांनी नमूद केलं. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात बदल करेल, असा अंदाज आहे, त्यात शेतकऱ्यांच्या हिताचे काही आहे का? हे पाहू,” असेही त्यांनी म्हटलं.