पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आता साहित्यिक मंडळीही मोदी सरकारवर टीका होताना दिसते आहे ‘प्रतिगामी विचार करणाऱ्या ‘नवीन भारता’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही.मत मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेतला जात आला आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे अशी आहे. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे,’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखिका नयनतारा सहगल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.
पुणे येथे आयोजित आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार’ सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सेहगल यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी दृकश्राव्य पद्धतीने मनोगत मांडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ख्यातनाम लेखक किरण नगरकर यांनी सहगल यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या एकीकडे सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणायचे आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची, हे विसंगत असून लोकशाहीला मारक आहे ‘सरकारला पाठिंबा देणारे आणि त्यांच्या बाजूनेच बोलले जावे व लिहिले जावे, अशी सक्ती केली जात आहे. सरकार नामक व्यवस्थेने लोकशाही व तिच्याशी संबंधित मूल्यांची पायमल्ली केली आहे.लोकशाहीप्रमाणेच धर्मनिरपेक्षताही धोक्यात आली आहे. भारतात सर्वकाही आलबेल आहे असे, भासवले जात आहे. प्रत्यक्षात देशातील अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत. आमच्या सोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. बुद्धिभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका सहगल यांनी केली. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा गुप्ते यांनी आभार मानले.
पुतळे नको कामगिरी हवी –
‘जे काही करणार असाल त्याचा विचार करा, असे कृष्ण गीतेत सांगतो; पण हे तत्त्वज्ञान कुठे गेले आहे, भारतीय माणसाची बुद्धी आज कुठे आहे,’ असे सवाल किरण नगरकर यांनी उपस्थित केले. ‘वल्लभभाईंचा केवढा पुतळा उभा केला. या पैशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारता आली असती. महाराष्ट्रातही पुतळे उभे करण्याचा रोग आहे. मोठ्या माणसांचा आदर कसा करायचा हेही आपल्या लोकांना माहीत नाही. पुतळे नको कामगिरी हवी आहे,’ अशा शब्दांत नगरकर यांनी सरकारची खिल्ली उडवली
त्यांच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही ठरवला जात आहे-
वर्ध्याला झालेल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की हजार वर्षांत हिंदू दहशतवाद्याचे उदाहरण दिसले नाही. मात्र पुण्यात एका कामगाराला विष्ठा खाऊ घातली जाते. हे कोणत्या मानसिकतेचे लक्षण आहे? दहशतवाद आणखी वेगळा काय असतो? सध्याच्या सरकारने देशद्रोहाची व्याख्या बदलली आहे. त्यांच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही ठरवला जात आहे.
– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते