अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या मागील निवडणुकीत २०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. भूल -थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले पण या सरकारने सगळ्यांचाच भ्रमनिरास केला. भाजप सरकार हे शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊ शकले नाही.बेरोजगार युवा वर्गाला रोजगार देऊ शकले नाही.हिंदुत्वाचा अजेंडा राबवत भारतीय घटना बदलण्याचे काम हे सरकार करत आहे.
या थापेबाज सरकारने नोटाबंदी केली त्यातून काही निष्पन्न झाले नाही सर्वसामान्यांचे अतोनात हाल झाले तसेच पुलवामा सारख्या घटनेवर गलिच्छ राजकारण येथील सरकार करत असून या सरकारला देशात हुकूमशाही आणायची आहे. अशा सरकारला आपण निवडून देणार की, लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या सरकारला निवडून आणायचे हे ठरवण्याची वेळ आज आलेली आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
अहमदनगर येथील मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, आ.प्रणिती शिंदे, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, मानाजी माने, महेश पवार, देवानंद गुंड, प्रकाश पाटील, विश्वासराव कचरे उपस्थित होते. बाळराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दिलीप कोल्हे, चेतन नरोटे , जाफरताज पटेल, डॉ. कौशिक गायकवाड , शहाजहान शेख , ब्रह्मदेव भोसले, नागनाथ सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आदि उपस्थित होते.