बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीवर टीका करणं सुरू केलं आहे. अनेक भाजप नेत्यांनी आणीबाणीची आठवण होत असल्याचं म्हणत टीका केली आहे. या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Rajendra Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.
अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं टीका केली होती, की हे पाहून आणीबाणीच्या काळाची आठवण होत आहे. अनेक भाजप नेत्यांनी तसं म्हटलं आहे. इतकंच नाही तर भाजपकडून राज्य सरकारविरोधात आंदोलनं देखील केली जात आहेत. याला आता रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करताना, विविध माध्यमांना त्रास देताना भाजप नेत्यांना आणीबाणी आठवत नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणतात, “पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या अभिनेत्यावर कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. परंतु, याच अभिनेत्यामुळं एका सामान्य व्यक्तीनं आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप, सोशल मीडिया हब सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मंध्यंतरी केंद्रानं केलेला प्रयत्न, पत्रकारांचा हक्क हिरावण्याचा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा ?”असंही ते म्हणाले आहेत.
पण याच 'अभिनेत्या'मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप,'सोशल मीडिया हब'सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही.हा कसला दुटप्पीपणा?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 4, 2020
अर्णब यांना अटक केल्यानंतर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली परंतु मानसिकता कायम आहे असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आणीबाणीचं समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो असं जावडेकर म्हणाले आहेत.