महागाव : बहुजननामा ऑनलाईन – संबंध जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज आज देशाला असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले.
महागाव येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. त्यांनी आजच्या काळात जगाला शांततेची गरज असून त्यासाठी जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. माजी आमदार विजय खडसे अध्यक्षस्थानी होते. धम्म परिषदेत भीमगीतांमधून अनेक गायकांनी लोकांना मंत्रमुग्ध केले. प्रा.खेमधम्मो यांनी गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जगाला गरज असल्याचे सांगितले. अशोक निकाळजे यांनी समारोपीय कार्यक्रमात गीते सादर केली. समारोपीय कार्यक्रमात विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार आदित्य संजय भगत याचा समाजभूषण म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ही परिषद पार पडली. दोन्ही दिवसीय धम्म परिषदेमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आयोजक सागर पाईकराव, परिषदेचे अध्यक्ष दलित खडसे, स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे आदींनी पुढाकार घेतला. आभार रामराव कांबळे यांनी मानले.