पालघर : बहुजननामा ऑनलाईन – राफेल विमान खरेदीबाबतची चर्चा ही विमानांच्या किमतीबाबत व्हायला हवी. वायुसेनेला १२५ राफेल विमानांची गरज असताना ३६ विमान खरेदीचाच करार का झाला? याचे उत्तर सरकारने आजवर दिलेले नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यासोबतच राफेल विमानांची अवस्था दाऊद इब्राहिमच्या विमान कंपनीतील विमाने ज्याप्रमाणे आता शो-पीस म्हणून विमानतळांवर उभी आहे तशीच होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
जी 36 विमाने खरेदी केली जाणार आहेत, ती वापरण्याच्या स्थितीत असायला हवीत. त्यासाठी सॉव्हरेन गॅरंटी असायला हवी. मात्र याबाबत मोदी सरकार काहीच बोलायला तयार नाही, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना ते पालघर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित सत्ता संपादन महामेळाव्या निमित्त पत्रकारांशी बोलत होते. यामुळे सध्याच्या स्थितीत अशी विमाने माझ्या दृष्टीने बिनकामी आहेत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. राफेल विमान खरेदीबाबत पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.