नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणेचा फेरविचार करुन शेतकऱ्याना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. दखल न घेतल्यास पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुठलाही भेदभाव न करता हेक्टरी किमान पंचवीस हजार रुपये मदत मिळावी, सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, शेतकऱ्यांना मदत देताना सरसकट सर्व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी, नंदुरबार तालुक्यातील तापी-बुराई उपसा सिंचन योजनेतून वटबारे, वावद या धरणांमध्ये पाणी सोडण्यासाठी शासनाचे लक्ष वेधावे, कर्जमाफीच्या योजनेत अजूनही शेतकरी वंचित असून शासनाच्या दि. १० ऑगस्ट २०१८ च्या अध्यादेशानुसार शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कर्जमाफीचा लाभ त्वरीत मिळावा, ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी पिक विमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना दुष्काळी निकषानुसार पिक विमा कंपन्यांकडून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, ती बँकेच्या कर्ज खात्यात जमा न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात दिली जावी, नंदुरबारात बाजार समितीला स्पष्ट आदेश देऊन कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आदेश द्यावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याविषयी गांभीर्याने विचार न केल्यास प्रहार शेतकरी संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल. तसेच पालकमंर्त्यांना नंदुरबार जिल्हाबंदी करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेप्रसंगी शेतकरी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, तालुकाध्यक्ष राजू पाटील, जिल्हा चिटणीस रविंद्र वळवी, प्रकाश सुळ, योगेश बोरसे, प्रविणसिंग राजपूत, किशोर पाटील, धनराज पाटील उपस्थित होते.