नवी दिल्ली वृत्तसंस्था – भाजप प्रणित NDA सरकारमध्ये नुकतेच केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग भगवा केल्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले भगवा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे. हा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या (चीवर)वस्त्राचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग भगवा केल्याने मी त्याचे समर्थन करतो. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग भगवा करण्याच्या मुद्द्यावरून अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत हा मोदींचा डाव असून मोदी देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भारतीय संघाच्या जर्सीचा रंग बदलण्यात आला आहे. असा आरोप अबू आझमींनी केला होता. यावर प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा तसेच शौर्याचं प्रतीक असलेला रंग आहे असे म्हटले आहे.
अबू आझमी केलेल्या आरोपाला उत्तर देत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून उगाच राजकारण सुरू आहे, आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको असे कधी म्हटले आहे का? यामुळे आझमी यांनी कोणत्याही गोष्टींवरून राजकारण करू नये.असे पाटील यांनी सांगितले. बीसीसीआयला जो रंग योग्य वाटला त्यांनी तो दिला. बीसीसीआयकडे संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार होता. भारतामध्ये भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे.
जर्सीच्या प्रकरणावरून राजकीय नेते राजकारण करताना दिसत आहेत. अबू आझमी यांनी टीका करताच आता रामदास आठवले आणि गुलाबराव पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कोण काय म्हणाले ?
अबू आझमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत असून मोदींमुळेच भारतीय संघाच्या जर्सीचा रंग बदलण्यात आला आहे.
रामदास आठवले : भगवा रंग हा बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा तसेच शौर्याचं प्रतीक असलेला रंग आहे.
गुलाबराव पाटील: आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको आहे असे कधी म्हटले आहे का, उगाच कोणत्याही गोष्टींवरून राजकारण करू नये.