सातारा : बहुजननामा ऑनलाइन – रिपाइंची युती भाजपाबरोबर असतानासुध्दा भाजपा सातारा जिल्ह्यातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादी निवडणुकीत रिपाइंला काही ठिकाणी राखीव जागा असतानासुद्धा एकही जागा देत नाहीत व साधे विचारातही घेतले जात नाही किंवा कुठल्या शासकीय समितीवर रिपाइंच्या पदाधिकारी यांना घेतले जात नाही म्हणून यापुढे जिल्ह्यात रिपाइं भाजपाला सहकार्य करणार नाही, असा निर्णय तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
संपूर्ण देशातून फक्त सातारा लोकसभेची जागा रिपाइंला दिली असताना सातारा लोकसभा मतदार संघात भाजपने रिपाइंला सहकार्य केले नाही, तसेच रिपाइंचे एकमेव उमेदवार अशोक गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न भाजपने केले नाहीत. फक्त इतर मतदार संघात रिपाइंची दलित मते घेण्याची व स्वत:ची मते रिपाइंला न देण्याचा अप्रत्यक्ष फॉम्र्युला भाजपने वापरल्याने साताऱ्याची जागा रिपाइंला गमवावी लागली, असेही रोकडे म्हणाले.
जावली तालुक्यातील गावागावात जाऊन भाजपच्या विरोधात मोर्चेबांधणी करणार असून जावलीतील दलित संघटनाच जातीयवादी भाजपला आसमान दाखवतील, असा विश्वास रिपाइंचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी व्यक्त केला. इथून पुढे कुणासोबत घरोबा करावयाचा याचा सर्वस्वी निर्णय रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल, अशी माहिती एकनाथ रोकडे यांनी दिली.
या बैठकीला हेमंत गायकवाड, प्रवीण कांबळे, दशरथ कांबळे, आनंदा कांबळे, जयसिंग रोकडे, हिंदुराव भिसे, निलेश शिंदे, नितीन जाधव, विकास जाधव, संतोष चव्हाण, जितेंद्र कदम, प्रशांत शिंदे, विशाल सपकाळ, सचिन कांबळे, बापू परिहार, संजय कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.