सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील वाड्या, वस्त्यांवर आजही वीज नाही. अनेक लोक वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणचे अधिकारी अनेक कारणे सांगत वीज देण्यास असमर्थता दाखवत आहेत. यावरून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले. पंतप्रधान तर दररोज टिव्हीवरून देशातील सर्व वाड्या वस्त्यांवर वीज पोहचल्याचे सांगातत आणि तुम्ही लोकांना वीज देताना अशी विसंगत माहिती का देता, असा सवाल आ. देशमुख यांनी विचारल्यानंतर उपस्थित महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांची चांगलीच गोची झाली होती.
नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची दिशा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी आ. गणपतराव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, प्रकल्प संचालक अनिल नवाळे उपस्थित होते. वीजेच्या प्रश्नावरून आ. देशमुख म्हणाले, अहो साहेब… आमच्या सांगोला तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर आजही वीज पोहचलेली नाही. पंतप्रधान दररोज टीव्हीवरुन देशातील घराघरात वीज दिल्याचे सांगतात. मग, तुम्ही इथे लोकांना वीज कनेक्शन देण्याबाबत एवढी विसंगत माहिती कशी काय देता? असा प्रश्न आ. गणपतराव देशमुख यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना केला. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना आणि सौभाग्य योजनेतून आमच्या लोकांना तुम्ही कधी वीज पुरविणार आहात. असा दुसरा प्रश्न त्यांनी केला. या प्रश्नांंमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. त्यांनी दिलेल्या उत्तरावर आ. देशमुखांचे समाधान झालेच नाही. त्यानंतर सांगोला तालुक्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सर्व लोकांना वीज पुरविण्यासाठी नियोजन करण्याचे आश्वासन देत अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी स्वत:ची सुटका करून घेतली.
यावेळी दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक गावात कामाचे नियोजन व्हावे, रोजगार हमीतून वैयक्तिक कामाबरोबरच शेततळी, नाला खोलीकरण, पाणंद रस्ते, विहिर आदी कामे योजनेतून करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले. सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा सुरु असताना जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एस. पी. बेंदगुडे यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दत्तक घेतलेल्या तावशी गावातील कामांची यादी वाचली. त्यामध्ये एकूण ४९ कामांपैकी ४३ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले. पाणीपुरवठा योजनेचा लेखाजोखा त्यांनी घेतला. अधिकाऱ्यांच्या उत्तराने संतापलेल्या खा. मोहिते-पाटील यांनी काहीही करा पण तावशीच्या लोकांंचे हाल करू नका अशा शब्दात तंबी दिली.