नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जुलमी राजवट संपवून स्वराज्य निर्माण केले. आता छत्रपती शिवरायांप्रमाणे देशातील जनतेने केंद्रात सध्या सुरू असलेली ही जुल्मी राजवट संपविण्याची गरज आहे. याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन संकल्प यात्रा काढण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वसमत येथे जाहीर सभेत बोलताना केले.
वसमत येथील युनिर्व्हसल स्कुलच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संकल्प यात्रा आली होती. संकल्प यात्रेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ.रामराव वडकुते, माजी खा.गणेशराव दुधगावकर, दिलीप चव्हाण, मुनीर पटेल यांची उपस्थिती होती.
सभेत मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले की, कर्जमाफी करतो म्हणणाऱ्यांनी आजपर्यंत कर्जमाफी केलीच नाही. पण, ऑनलाईन आणि ऑफलाईनचा घोळ घालत शेतकऱ्यांना रांगेत उभे करण्याचे काम केले. उद्धव ठाकरे म्हणतात की कर्जमाफीत महाघोटाळा झाला. पण, ते सत्तेत आहेत, ते केवळ बोलतात. प्रत्यक्ष मात्र काहीच करत नाहीत. दुसरीकडे देशातील पहारेकरी चोर आहेत असे देखील म्हणतात. मग, ते त्यांच्या सोबत राहतातच कसे? असा प्रश्न भुजबळ यांनी केला. सभेला परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.