पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात
दुष्काळी परिस्थिती असल्याने खासदार, आमदार यांचे वेतन एका वर्षांसाठी थांबविण्यात यावे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पगार ५० टक्के दुष्काळी उपायोजनांसाठी वळवून, शेतकऱ्यांच्या दावणीला चारा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे सुमारे साडेपाच हजार कोटींची एफआरपी थकीत आहे.
एफआरपी थकीत असणाऱ्या कारखान्यांवर शासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना, याबाबत केवळ चालढकल करण्यात येत आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’च्या वतीने २८ रोजी पुणे येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी राज्यातील सरकार हदरवून सोडणार आहे. दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार अपयशी ठरले असून, पाण्याचे नियोजनही चूकले आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत करण्यात यावी अशी मागणी तुपकर यांनी केली. आळंदी- पंढरपूर- मोहोळ या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ साठी शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रसंगी आंदोलन उभारणार आहे. केवळ एसी रूममध्ये बसून पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने उन्हाळी हंगामात पाणीटंचाई जाणवणार असल्याचे तुपकर म्हणाले.
यावेळी माजी उपसभापती विष्णू बागल, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, वासिम जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जिल्हा संघटक विजय रणदिवे, नवनाथ माने, भिमराव फुले, सचिन पाटील, श्रीनिवास भोसले, गोपाळ गार्घे, मदन जाधव, शिवाजी चव्हाण, ॲड. राहुल घुले, किर्तीकुमार गायकवाड, अमर इंगळे, आबा शिंदे, रणजित बागल, राहित भोसले, भाऊबली सावळे, शिवाजी सावंत, विनोद गाडवे, सुर्यभान जाधव आदी उपस्थित होते.