मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात हुकूमशाही सुरू असल्याचे अनेक कलाकारांनी आणि साहित्यीकांनी याआधीच म्हटले आहे. आता छत्रपती शिवाजी महाजारांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील देशात ‘हूकुमशाही’ असल्याचे म्हटले. तसेच मोदी सरकारने देश विकल्याची घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देशहितासाठी तुम्ही खुशाल निर्णय घ्या. परंतु, हुकूमशाही आणू नका एक दिवस एक माणूस संध्याकाळी टीव्हीवर येतो आणि नोटबंदी जाहीर करतो. नोटबंदी आणि इतर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. परंतु तसे न करता मोदींनी अचानक देशावर नोटबंदी लादली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ येत असून नोटबंदीच्या दरम्यान अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.
मोदी सरकारने देशातील जवळच्या मित्रांना नॅचरल गॅस, नॅचरल ऑईलचे साठे देऊन टाकले आहेत .आज मितीला मोदींच्या मित्रांची संपत्ती देशाच्या बजेटपेक्षा अधिक आहे. या संपत्तीचा उपयोग करून देशातील युवकांना मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय सुविधा, मोफत निवारा देता आला असता. परंतु, हे सगळं जवळच्या मित्रांनाच दिल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.