पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election) पुन्हा एकदा जनतेने एनडीए (NDA) आघाडीला स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विषयी महत्त्वाचे विधान केले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार (Thackeray government.) चार वर्षे टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. यापुढेही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार चार वर्षे टिकणार नाही. मात्र, भविष्यात काय होईल, हे गुलदस्त्यात आहे, असे सूचक वक्तव्यही पाटील यांनी केले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्र सरकारवर देखील त्यांनी टिका केली. महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपच्या बाजूने कल दिसेल. विद्यार्थी, कामगार, शिक्षक, महिला, शेतकरी अशा एक हजार लोकांचे सर्वेक्षण केल्यास त्यापैकी 900 लोक भाजपच्या बाजूने मत मांडतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये सध्या कोणताही घटक सुखी नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे सरकार बदलले पाहिजे, अशी लोकांची इच्छा असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे देशात १८ राज्यांमध्ये सरकार आहे आणि विजयाची ही परंपरा कायम राहणार आहे. बिहारमध्ये झालेल्या निकालाचा परिणाम हा आगामी पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांत होणार आहे. भाजपाला त्याचा फायदा झालेला दिसेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. बिहारच्या निकालानंतर देशभरामध्ये उत्साहाची लाट आली आहे. त्याचा परिणाम हा राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांवरही होणार आहे. या मतदारसंघांचे निकाल कायम भाजपाच्या बाजूने राहिले आहेत आणि आताही राहतील, असे पाटील म्हणाले.
बिहारचे निकाल लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसच्या बाजूने निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली नाही. बिहारमध्ये विरोधकांना 110 जागा मिळाल्या आहेत. मग तेथे ईव्हीएम सदोष होते, असे म्हणायचे का?, असा सवाल पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.
राहुल – प्रियांका जळगावात येणार का ?
जळगावमधील पारोळा येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची विष पाजून हत्या झाली. ही घटना दुर्दैवी असून या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी येणार का?, असा सवाल पाटील यांनी केला.