मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी अनेक वक्तव्य केली आहेत. अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांनाही या निवडणुकीचे श्रेय दिले आहे. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचीही बिहार निवडणुकीबाबत प्रतिक्रिया आली आहे. मात्र पंकजा यांनी बिहारच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले आहे. पंकजा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाळल्याचे दिसत आहे.
पंकजा मुंडें यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, बिहार विधानसभा आणि विविध प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा सुशासन, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा स्विकार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या रणनितीचा हा विजय आहे. या विजयाबद्दल गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्याचे मनापासून अभिनंदन करते, असे त्यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा दिल्या. भाजप नेते प्रसाद लाड यांनी भाजपाच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून बिहार विजयाचे यश देवेंद्र फडणवीसांमुळेच मिळाल्याचे म्हटले आहे. शिवाय, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.