पुणे : बहुजननामा ऑनलाईन – घरात कामाची वेळ असो की ऑफिसमध्ये मिटींगची वेळ कॉल आला की तो रिसिव्हही करता येत नाही. त्यात कॉलची रिंगटोन वाजतच राहते. ज्येष्ठ नागरिकांना कॉल वाजून गेलेला कळतही नाही. मात्र आता फोन कॉलची रिंग किती वेळ वाजावी हे ग्राहकांना निश्चित करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉलची रिंग वाजण्याचा कालावधी ठरविण्याची मुभा ग्राहकांना असावी असा प्रस्ताव मांडला असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये वोडाफोन कंपनीने ही सेवा सुरु केली असून पुढील काही दिवसांमध्ये सर्वच कंपन्या या सुविधा देतील, अशी शक्यता आहे. परदेशातील टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना या पद्धतीची सेवा पुरवतात. या पार्श्वभुमीवर भारतातही ही सेवा सुरु करण्याचा निर्णय ट्रायने घेतला आहे. याबाबत ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये चर्चा करुन लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
या पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी एक विशिष्ट कोड तयार केला जातो. त्या कोडवर एसएमएस केल्यानंतर ग्राहकाला कॉलच्या रिंगची अपेक्षित वेळ विचारली जाते. साधारण १४-१५ सेंकद असा कालावधी असतो. त्याप्रमाणे ग्राहकाने पर्याय निवडायचा असतो. या प्रक्रियेसाठी ‘ट्राय’कडून टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या असून त्यावर अभ्यास करून अंतिम मंजुरी ‘ट्राय’कडून दिली जाणार आहे. ही सुविधा अनेक ग्राहकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास ‘ट्राय’चे सचिव एस. के. गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
Visit : bahujannama.com