बहुजननामा ऑनलाइन टीम – देशाच्या जीडीपीमध्ये तिमाहीत दिसून आलेले 23.9 टक्कयांचे आकुंचन अत्यंत चिंताजनक असल्याचे मत रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. धोरणकर्ते व नोकरशहांनी आत्मसंतुष्ट वृत्तीला झटकून अर्थपूर्ण सक्रियता दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले.
भारताच्या जीडीपी 23.9 टक्कयांनी आक्रसला आहे. विकसित राष्ट्रातील कोविड-19 कहराने सर्वाधिक प्रभावित दोन राष्ट्रांपैकी इटलीतील घसरणीची मात्रा 12.4 टक्के, अमेरिकेत हे प्रमाण 9.5 टक्के आहे.
आत्ममग्न असलेल्या नोकरशहांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे. या संकटाचा मुकाबला म्हणून वर्तमान स्थितीत सरकारने फारसे काही करण्यास अनुत्सुकता दर्शविली आहे, असे निरीक्षणही राजन यांनी नोंदविले आहे. कदाचित भविष्यात आर्थिक प्रोत्साहन गरज लक्षात घेऊन संसाधनांची गरज जतन केली जात असावी.
वर्तमानात सरकारकडून दिलासादायी पाठबळ आणि मदत खुली होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास अर्थव्यवस्थेला आणखी मोठा आघात पोहचविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ब्राझीलने मदतकामात मोठी रक्कम खर्च केली आणि म्हणूनच भारताच्या तुलनेत त्यांच्या अर्थ-अधोगतीचे प्रमाण कमी राहिल्याचे दिसून येते. भारतातील विषाणूजन्य साथीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर अर्थप्रोत्साहनाचे काम हाती घेण्याचा जर सरकार विचार करीत असेल, तर तोवर खूप उशीर झालेला असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.