बहुजननामा ऑनलाइन – राजकारणात पूर्वीचे लोक वचन पाळायचे, साथ देणार्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवायचे पण आता सगळे वेगळे आहे. सोबत राहिल्यानंतरही रात गई बात गई.. असा प्रकार चालतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता चिमटा काढला.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच माजी सदस्यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतर ते बोलत होते.
राज्यात युतीसाठी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवल्याच्या प्रकरणावरून ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोले लगावले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते. त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत होते. मलासुद्धा त्यांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण आता वेगळे आहे. वर्षांनुवर्षे साथ दिल्यानंतरही लोक रात गई बात गई.. असे वागतात, असा टोला ठाकरे यांनी लगावला.