नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला. वर्तमान परिस्थितीत आंबेडकरी पत्रकारिता या विषयावरील हे चर्चासत्र लष्करीबाग येथील आंबेडकर मिशन सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मार्गदाता’चे दिलेश मेश्राम होते. वक्ते म्हणून कवी लोकनाथ यशवंत, अनिल वासनिक, मिलिंद फुलझेले, ॲड. हंसराज भांगे, सिवनीचे डी. डी. वासनिक उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम उपस्थित होते.
कवी लोकनाथ यशवंत यांनी आंबेडकरी साहित्याचा आढावा घेतला. दलित साहित्य उपेक्षित वर्गाचा आवाज आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार या साहित्याने केल्याचे मत त्यांनी मांडले. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल, असे आवाहनही लोकनाथ यशवंत यांनी केले. अनिल वासनिक म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील महान पत्रकार व संपादक होते. परंतु, प्रस्थापितांनी त्यांचा संपादक म्हणून उल्लेख हेतूपुरस्सर टाळला. वृत्तपत्राचा समाज परिवर्तनाचे अमोघ अस्त्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापर केला. ‘मूकनायक’ पासून त्यांनी सुरू केलेला पत्रप्रपंच बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत वाढविला. अस्पृश्य वर्गास विचार प्रवृत्त करून संघर्षमुख करण्याचे काम आंबेडकरी पत्रकारितेने केले, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रा. प्रवीण कांबळे, राहुल दहीकर, राजकुमार वंजारी, एन. टी. बांबोले, सी. टी. मेश्राम, प्रभाकर पानतावणे, मिलिंद गोंडाणे, वामन सोमकुंवर, लहानू बन्सोड, रमेश घरडे, दिनेश खोब्रागडे, अरुण गायकवाड, ओमप्रकाश मोटघरे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.