सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ५ मार्च रोजी विद्यापीठ नामांतराची घोषणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्यात धनगर समाजाची मतदारसंख्या लक्षात घेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विद्यापीठाचे नामांतर करीत धनगर समाज बांधवांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने केला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमितीची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नांव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवा वीरशैव संघटनेने आक्रमक आंदोलन करून महाराष्ट्र ढवळून काढला होता. तर धनगर समाज बांधवांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नांवासह मोर्चे, धरणे आंदोलनासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळून व निषेधाची निवेदने भिरकावून नामांतर आंदोलन तीव्र केले होते. शिवा आणि धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने करून नामांतरप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले होते.
दीड वर्षापूर्वी नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर धनगर समाज बांधवांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणाचा विषय छेडला होता. त्यावेळी मुख्यमंर्त्यांनी हजारो धनगर समाज बांधवांसमोर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव देणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेला दीड वर्षे उलटल्यानंतर म्हणजेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नामांतराची घोषणा करून धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने केला आहे. दरम्यान, या निर्णयाबरोबरच धनगर आरक्षण संदर्भातील आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे सुद्धा माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनुसार सर्व निर्णय उपसमितीने घेतले आहेत. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, मुख्यमंर्त्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आदिवासी विभागाचे प्रधान सचिवा मनीषा वर्मा, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, संबंधित अधिकारी उपस्थित होते.