नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – येथील माळी समाज अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर व त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांबाबतचे निवेदन समस्त माळी पंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१८ मार्च रोजी आनंद बाबुराव माळी यांचा रस्ता अडवुन महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ काही जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामुळे हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही जणांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरून खंडणी वसूल करणे, शहरात मुलींची छेडखानी करणे, रस्ता लूट करणे, अवैध धंदे करणे असे प्रकार सुरू केले आहे. यामुळे शहराचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे. सदरची बाब गांभिर्याने घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर किसन महाजन, छोटालाल माळी, बाबुलाल माळी, निंबा माळी, जगन्नाथ माळी, माणिक माळी, विजय माळी, कैलास माळी, पंडीत माळी, संभाजी माळी, हितेश माळी, मोहन माळी, निलेश माळी, लक्ष्मण माळी, नरेंद्र माळी, शिवाजी माळी, राकेश खलाणे, भगवान माळी, प्रकाश माळी, आनंदा माळी, नानाभाऊ माळी यांच्या सह्या आहेत.