लातूर : बहुजननामा ऑनलाईन – मुलीला तुझा भाऊ नीट नांदवत नाही म्हणून धाकट्या भावाला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याची घटना १५ दिवसांपूर्वी निलंगा शहरात घडली होती. ही बाब अंधश्रध्दा निर्मूलन समितीने प्रकाशात आणताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया गतिमान करताच जात पंचायतीने सपशेल माफी मागून आपला निर्णय रद्द केला असून जात पंचायतही बरखास्त केली आहे.
निलंगा शहरातील भिल्लवस्ती येथे वास्तव्यास असलेल्या गोविंद व्यंकट गानगुळे (वय २७) या तरुणाचा मोठा भाऊ सुरेश गानगुळे यांचा विवाह भिल्ल समाजाच्या जातपंचायतीचे सदस्य लक्ष्मण गंगाराम विभुते यांच्या मुलीशी झाला होता. त्यांना तीन मुले व दोन मुली आहेत. नंतर सुरेशला दारूचे व्यसन लागल्यामुळे विभुते यांनी जात पंचायत बसविली आणि काडीमोड घेतला. यात पाचही मुले वडिलांकडे राहतील आणि मुलगी माहेरी राहील असा निर्णय ठरला. यावेळी सुरेशची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती होती. परंतु तिचा गर्भपात करून तिचे दुसरीकडे लग्न लावून देण्याचे ठरले. परंतु लग्न जुळले नाही, त्यामुळे पुन्हा जात पंचायत भरवून सुरेशकडील सर्व मुले आईकडे सोपविण्याचे व जात पंचायतीकडे ५० हजार रुपये भरण्यास गोविंद व्यंकट गानगुळे याला सांगण्यात आले.
परंतु पैसे भरण्यास नकार देताच गोविंदच्या पत्नीसह सर्व कुटुंबाला जात पंचायतीमधून बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतला. या संदर्भात गोविंदने अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मध्यस्तीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव माधव बावगे यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबाबत प्रबोधन केले आणि जात पंचायतीचे डोळे उघडले.