मुंबई बहुजननामा ऑनलाइन : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आता चांगलीच खेळी रंगणार आहे. कारण दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काल, शुक्रवारी आम आदमी पार्टीने यासंदर्भात घोषणी केली. आधीच इतर पक्षांत चाललेल्या स्पर्धेत आता ‘आप’ आपलं नशीब आजमवणार आहेत. आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ आपले उमेदवार उभे करणार असून उमेदवार निवडण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली आहे. या निवडणुकीत आप अनेक जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते महाराष्ट्रातील विविध भागात सभा घेणार असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.
‘आप’ने निवडणुकीत उतरण्याची घोषणा करताना म्हटले आहे, की महाराष्ट्र सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तसेच मोर्चांवर अयशस्वी ठरली आहे. अशा स्थितीत राज्यातील संकटग्रस्त लोकांच्या हितासाठी निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ‘आप’चे प्रदेश प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजप आणि शिवसेना युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पक्षाच्या निर्णयाची माहिती देताना पाठक यांनी म्हटले की, पाच वर्षापूर्वी काँग्रेस सरकारला कंटाळून परिवर्तनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या बाजूने लोकांनी कौल दिला. मात्र, हे सरकार देखील जनहितासाठी अयशस्वी ठरले. देशातील सर्वांत विकसीत राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आज पूर, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आदी समस्या भेडसावत आहेत. राज्यात वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीमुळे विकासावर परिणाम झाला आहे. त्यावर आता उपाय शोधण्यास हे सरकार ठोस पाऊले उचलण्यास अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.