मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविले आहे. त्यानंतर आता चालू शैक्षणिक वर्षात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी एसईबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. मात्र या प्रवेशासंदर्भात भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यात ११ वी प्रवेशाच्या एसईबीसी प्रवर्गाच्या तब्बल ३० हजार जागा रिक्त आहेत. तर ईडब्लूएस प्रवर्गातील २६ हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या प्रवर्गातून अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनांनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक पारित केले. त्यानंतर राज्यात महाराष्ट्रात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाले. या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने काल हे आरक्षण वैध ठरविलं. परंतु ते १६ टक्क्यांऐवजी १२ ते १३ टक्के असावं असंही स्पष्ट केलं. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.
त्यानंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात मुख्यमंत्र्यांचे निवेदन वाचून दाखवले. त्यात एसईबीसी आणि ईडब्लूएस घटकांतील बहुतांश विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार राज्यात अकरावी प्रवेशासाठी तब्बल ३४२५१ जागा राखीव आहेत. तर ईडब्लूएस प्रवर्गासाठी २८६३६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी एसईबीसी प्रवर्गासाठी राज्यभरातून केवळ ४५५७ अर्ज दाखल झाले आहेत. तर ईडब्लूएससाठी २६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी संबंधित प्रवर्गातून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला जमा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यासाठी वडिलांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. हे हमीपत्र संकेतस्थळावर उपलब्ध राहील. असे शेलार यांनी यावेळी सांगितले.