बहुजननामा ऑनलाईन- सुप्रीम कोर्टीनं नांदेडमधील गुरुद्वारा प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला आहे. आज सुप्रीम कोर्टात नांदेड गुरुद्वारा प्रकरणी अंतिम सुनावणी झाली. फडणवीस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड गुरुद्वारात 4 विश्वस्तांची नियुक्ती केली होती. गुरुद्वारा प्रबधक कमिटीच्या काद्यानुसार राज्य सरकार गुरुद्वाराच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
औरंगाबाद उच्च न्यालायच्या खंडपीठानं नांदेड गुरुद्वारा संदर्भातील निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. फडणवीस, सरकारनं गुरुद्वारासंदर्भात हा अध्यादेश काढला होता. गुरुद्वारा बोर्डाच्या कामात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असं महत्त्वाचं मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या प्रकरणी याआधी सुनावणी झाली होती. त्यावेळी फडणवीस सरकारनं केलेल्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. यानंतर फडणवीस सरकारनं या निर्णयाविरोधात आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. कोर्टात या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टानं आता आपला अंतिम निर्णय दिला आहे.