नवी दिल्ली – वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीनंतरच्या महिन्याभराच्या सत्ता नात्यानंतर राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या सत्तासंघर्षांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राज्यातील सत्तासंघर्ष म्हणजे एक थ्रिलर सिनेमा आहे. काय होईल माहित नव्हतं, मी झोपेतही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल.’ असे राऊतांनी म्हंटले. सध्या दिल्लीत संसदेच्या अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत आहेत. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मनसोक्त गप्पा मारल्या. ‘राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता, आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच विचार नेहमी डोक्यात सुरु होते.
पवारांना भेटायला जायचो, तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील, अश्या चर्चा रंगवल्या जात होत्या. जवळपास महिला उलटला, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले पण बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली. हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता, असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय पाऊल पुढे म्हणाले कि, ‘ सकाळी सकाळी अंघोळ करुन बसलो तेवढ्यात एकाने सांगितले कि, अजित पवारांनी शपथ घेतली, मी म्हटलं की, मागची क्लीप असेल, हा फाजिल आत्मविश्वास होता. शरद पवारांवर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी मनात आणलं आपल्याला हे करायचं आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात.
पवारांचा शब्द होता फडणवीसांना घरी बसवायचा, साताऱ्यात पावसातही कमिटमेंट केली होती, असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतुकच केले. तसेच, गेल्या ३६ दिवसाचा खेळ कमिटमेंटचा खेळ होता. माझ्यावरही दबाव होता आपल्यामुळे नुकसान होत नाही का? शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखविला. आमदारांना सांभाळण्याची जबाबादारी सगळ्यांनी पार पाडली. महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्याने देशाला दिशा दिली. महाराष्ट्राने भीती मारली. संपविली त्याचे श्रेय महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्यांना जातं असंही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षाचे खासदार यावेळी उपस्थित होते.
Visit : bahujannama.com