नागौर : वृत्तसंस्था – एका मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्या करून पळून जात असतानाच मुलाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या वयात आई-वडिलांची सेवा करायची असते, त्याच वयात त्याने त्यांचे जीवन संपवले. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात भदाणा गावात घडली. भदाणा गावातील डेगाना महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला असून त्याचे नाव हनुमानराम (वय – ४०) आहे. त्याच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली व त्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी त्या व्यक्तीबद्दल अधिक तपास केला असता त्याने, आपल्या आई-वडिलांच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळाली. रुघाराम (वय-८२) आणि पतासीदेवी (वय- ८०) ही मृतांची नावे आहेत. आई-वडील गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर वार केल्याची माहिती हनुमानराम याच्या बायकोने पोलिसांना दिली. हत्या केल्यानंतर तो दुचाकी वरून पळून गेला त्याच्या पत्नीने त्याला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला होता पण तो थांबला नाही.
भदाणा गावात वृद्ध आई-वडिलांची हत्या झाल्यावर एसपी पाठक, एएसपी रामकुमार कस्वा, डीएसपी मुकुल शर्मा या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नंतर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. जमिनीच्या वादातून हमुमानराम ने ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.