बहुजननामा ऑनलाइन – कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटू लागला आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने-सामने आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शिवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघा़डीचे सरकार पडेल, पण रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही. भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल. ज्या दिवशी भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फड़णवीस मुख्यमंत्री होतील त्यादिवशी याबाबतचा निर्णय होईल,’ असे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे. दीड लाख लोकांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच नाणार प्रकरणात शिवसेनेची भूमिका ठामपणे सांगितली होती.
राऊत यांनी पुन्हा एकदा नाणार रिफायनरी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश भूकंपप्रवण क्षेत्राच्या रेड कॅटॅगरीमध्ये केला आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी आणि जैतापूर अणुउर्जा प्रकल्पही रत्नागिरीत होणार नसल्याचे राऊत म्हणाले. तरीही जे कुणी शिवसैनिक असल्याचं सांगत रिफायनरीला आपल्या जमिनी देण्यास संमती देत आहेत, ते भूमाफियांचे दलाल असून त्यांची कोणतीही दखल मुख्यमंत्री घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर जठार यांनी भारतीय जनता पक्षांची भूमिका स्पष्ट केली आहे.