अहमदाबाद : बहुजननामा ऑनलाईन – आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत पण गुजरातमधील अहमदाबाद येथे एक माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे . घोड्यावरून लग्नाची वरात काढली म्हणून दलितांना साऱ्या गावाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. वरात काढल्यानंतर दोनच दिवसात या गावाने दलितांवर बहिष्कार टाकला.संबंधित गावातल्या दलितांना कोणताही दुकानदार कोणतीही वस्तू विकत नाही, एवढंच नाही तर त्यांना रिक्षावालेसुद्धा आपल्या रिक्षातून प्रवास करू देत नाहीत. त्यामुळे या गावातल्या दलितांचं रोजचं जगणं मुश्कील झालं आहे.
मेहुल परमार असे या दलित तरुणांचे नाव आहे या दलित तरुणाच्या लग्नाची वरात गावातून काढण्यात आली.वाजत-गाजत घोड्यावरून वरात काढल्याच्या दोन दिवसानंतर मेहसाणा जिल्ह्यातल्या लोर नावाच्या गावात इतर गावकऱ्यानी दलितांवरच बहिष्कार टाकला आहे. या गावातील उच्चवर्णीयांचा दलितांनी लग्नाची वरात घोड्यावरून काढण्यास आक्षेप आहे.
या सामाजिक बहिष्काराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त गावात देण्यात आला आहे .