बहुजननामा ऑनलाइन – सिंधुदुर्गात होत असलेला(vinayak raut )आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख यांनी लातूरला नेण्याची मागणी केल्यानं महाविकास आघाडीत ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत(vinayak raut )यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत असं म्हणत विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारचा नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. आता देशमुखांच्या मागणीनंतर विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. राऊत म्हणाले, “आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात अभिप्राय मागवला असता अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा अशी मागणी अमित देशमुख यांनी केंद्र सरकारकडे केली पत्राद्वारे केली आहे. हे पूर्वनियोजित असून अतिशय निंदनीय आहे.”
पुढे राऊत म्हणाले, “नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्यामुळं प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता पण आता उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत. जर हा प्रकल्प कोणी पळवण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू” असा इशाराही विनायक राऊत यांनी अमित देशमुखांना दिला आहे.
“अमित देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यांचं प्रेम वेगळं होतं. परंतु अमित देशमुखांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही. पत्रव्यवहार केले परंतु उत्तरं दिली नाहीत. हे अशोभनीय आहे. अमित देशमुखांनी विलासरावांचे गुण घेतले पाहिजेत” असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. आता सीएम उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.