मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे प्रकरणावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार पडेल किंवा सरकार अस्थिर झाल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं. एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही. सरकार पुढचे साडेतीन वर्ष चीतपट करणे कुणालाही जमणार नाही, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार राऊत म्हणाले, की, वाझे प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएस तपास करत आहे. केंद्रीय संस्था तपास करताना त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. मात्र त्यावर आमचे लक्ष आहे. राज्यात खातेबदलाच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील निर्णय असतो. मात्र सरकार तीन पक्षांचे असल्याने 3 पक्षाचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतात. त्यावर मी बोलणे योग्य नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत होते. मात्र एखादी व्यक्ती आधी शिवसेनेशी संबधित असेल तो काय गुन्हा नाही. शिवसेना बंदी घातलेली संस्था नाही. प्रत्येक मराठी माणूस कधीनाकधी शिवसेनेशी संबधित असतो, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसात अनेक प्रकरणांमध्ये पाहिले गेले आहे की, एनआयए किंवा केंद्रीय संस्थांना अटकेची फार घाई असते. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथे जाऊन कारवाई करण्याचा छंद काही लोकांना जडला आहे. त्यामुळे याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.