बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून कित्येक दिवस उलटले तरी आद्यपही राजकीय गोंधळ संपत नाहीये. निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सेनेनं जे ठरलं ते झालं पाहिजे असा हट्ट धरत मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यावर भाजप आणि सेनेच एकमत होऊ शकत नाही. शेवटी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. भाजप आणि शिवसेनेच्या वादामुळं अखेर त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. मात्र त्यावेळच सेनेला दावा करता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला संधी देण्यात आली. त्यांनी सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ मागितली पण राज्यपालांनी नकार देताच गेल्या आठवड्यात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपने पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांची राष्ट्रवादी-काँग्रेससोबत हातमिळवणी सुरु आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १७० ते १७५ आमदारांचे पाठबळ मिळवत लवकरच सेनेचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं. शिवसेनेकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पवार म्हणाले, निकालानंतर आम्हाला जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे असंही सांगितलं होतं. एवढेच नव्हे तर सरकार स्थापनेच्या चर्चेसंदर्भात शरद पवारांना विचारले असता, कसली चर्चा, कोणाशी चर्चा, ते सगळे शिवसेनेलाच विचारा, त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू असे उत्तर दिले.
पवारांच्या या उत्तरामुळे शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपसोबतचे संबंध खराब झाले, केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता एनडीएतूनसुद्धा शिवसेना बाहेर पडली आहे. यातच संजय राऊतांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, आणि त्यात शरद पवारांनी सेनेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. या सर्वांत शिवसनेची मात्र पुरती कोंडी झाली आहे. सध्या सेनेकडे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणं हाच पर्याय उरला आहे. मात्र सेनेची हिंदुत्ववादी भूमिकेची काँग्रेसला अडचण असल्याच म्हटलं जात आहे. त्यामुळे आता शिवसेना हे नवीन समीकरण कसं घडवून आणणार हे पाहणे महत्वाचे आहे.
Visit : bahujannama.com