बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता, मात्र भाजप-शिवसेनेच्या अंतरंगात वादामुळे २५ दिवस उलगडून गेले तरी सत्ता स्थापन झाली नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान भाजपसोबत न जमल्याने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहे, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास संजय राऊत व्यक्त केला असून भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असा घणाघात ही राऊत यांनी केला.
२०१४ मध्ये युती तुटली होती. त्यामुळे आम्हाला परत युतीत जायची इच्छा नव्हती. परंतु सध्या भाजपने आपला मित्रपक्ष गमावला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला मोठी किंमत मोजावी लागणार असून भाजपच्या अंताची सुरुवात हि महाराष्ट्रातूनच होणार आहे. तसेच लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल आणि त्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. १७० जणांचा पाठिंबा दाखवून शिवसेना विधीमंडळात बहुमत सिद्ध करेल. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले. तसेच सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असं म्हणत राऊत यांनी माध्यमांवरही टीका केली.
दरम्यान, आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण ? असा सवाल शिवसनेकडून सामनाच्या संपादकीय मधून केला आहे. राज्यात भाजपाला उभं करण्याचं काम शिवसेनेनं केलं, आम्ही संपादकीय मधून सत्य मांडलं आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, अश्या शब्दात सामन्यातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Visit : Bahujannama.com