मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संसदेच्या हिवाळी अधिवेशनास काल (सोमवारी) सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची भरभरून प्रशंसा केली. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विधानसभेचा निकाल लागून २५ दिवस उलगडले तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झाले नाही, भाजपला बहुमत मिळूनही शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीमुळे महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे आता सत्तेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार असल्याची पक्षाच्या नेत्यांची आपसातील चर्चा सुरू आहे. दरम्यान जर भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्यास भाजपचे १०५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांचे संख्याबळ १५९ होते, तसेच भाजपला इतर १४ आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ १७३ होते. जरी राष्ट्रवादीचे ५४ सदस्य हजर नसले तरी सभागृहात २३४ सदस्य उरतात.
अशा वेळी बहुमतासाठी भाजपला ११७ आमदारांची गरज असते तर भाजपकडे ११९ आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करू शकतात. याच पद्धतीने राष्ट्रवादीने २०१४ साली भाजपला मदत दिली होती.दरम्यान, जर भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी सहभागी झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद व १५ मंत्रिपदे मिळू शकतात. शिवाय केंद्रातदेखील एखाददुसरे मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. सोबतच भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
Visit : bahujannama.com