बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीच्या वेशीवर काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यावर तोडगा देखील निघाला नाही. विरोधी पक्षांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद, राष्ट्रपती भेट, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र अशा अनेक गोष्टी विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु, कमजोर विरोधकांमुळे सत्ताधारी मोदी सरकारवर दबाव येत नाही अशी भूमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली, असं म्हणत अपयशाचं खापर शिवसेनेने काँग्रेसच्या माथी फोडलं आहे. याच मुद्द्याला हात घालत एका भाजपा नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे. विरोधी पक्षातील नेते सध्या कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले आहेत.
दरम्यान, राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असं कृषीमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात? यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचं आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच”, असं मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारीना शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकारच्या या निष्काळजीपणाचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात विरोधी पक्षांच्या अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं आहे. निपचित पडलेल्या विरोधी पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचं आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही.असं मत अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.