बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं नगरच्या शिवसेनेत जातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पदाधिकाऱ्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत जातीचं राजकारण केलं जात असल्याचं या पत्रात स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा नगरमधील शिवसेनेत दुफळी पडत असून गटबाजी असल्याच्या चर्चेला बळ मिळू लागलं आहे.
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड 1 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र यावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत शेळके यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसेनेत जातीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
शेळकेंनी पाठवलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय ?
‘आजपर्यंत नगरमध्ये दिवंगत अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचं राजकारण शिवसेनेत केलं नाही. त्यामुळंच नगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून जातीचे राजकारण करून दिवंगत अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केलं होतं. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचं राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. भाऊ कोरेगावकर आणि काही जातीवादी फुटीर शिवसैनिक आपल्या पक्षाला गळती लावायचं काम करत आहेत. तरी आपण यात तातडीनं लक्ष घालावं आणि नगरच्या शिवसेनेत चाललेली धूसफूस थांबवावी. अन्यथा यापुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल.” असंही पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
शेळकेंनी या पत्राची प्रत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख तसेच शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनाही दिली आहे.